कर्नाटकात काँग्रेसचा पराभव होणार हे चित्र स्पष्ट दिसताच काँग्रेस नेत्यांनी नेहमीप्रमाणे सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. या पराभवाला राहुल गांधी नाही, स्थानिक नेतृत्व जबाबदार आहे असे काँग्रेस नेते डी.के.शिवाकुमार यांनी म्हटले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राहुल गांधींनी त्यांच्याबाजूने उत्तम कामगिरी केली पण आम्ही या निवडणुकीत कमी पडलो. हा आमचा पराभव आहे असे शिवा कुमार यांनी म्हटले आहे. भाजपाने बहुमतांसाठी आवश्यक असलेला ११३ चा आकडा गाठला असून भाजपा ६८ आणि जेडीएस ३९ जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटकात बाजी मारणारेच २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकतील
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता येत्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना योगगुरु रामदेव बाबा यांनी मोठे भाकित वर्तवले आहे. कर्नाटक निवडणुकीचा निकाल देशाच्या राजकारणाला नवी दिशा देईल. कारण, जो पक्ष ही निवडणूक जिंकेल त्यांच्यात २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता असेल असे त्यांनी म्हटले आहे.

कर्नाटकही झाले काँग्रेसमुक्त
मार्चमध्ये त्रिपुरा आणि नागालँडमध्येही सत्ता स्थापन करत भाजपाने २१ राज्यामध्ये आपली सत्ता स्थापन केली. डिसेंबर महिन्यात झालेल्या दोन राज्यांच्या निवडणुकींमध्ये भाजपाने गुजरातबरोबच हिमाचल प्रदेशातही सत्ता स्थापन केली. हिमाचलमधील विधानसभेच्या ६८ जागांपैकी भाजपाने ४४ जागांपर्यंत मुसंडी मारली. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष भारतात फक्त तीन राज्यांपुरता मर्यादित राहिला होता. त्यातही कर्नाटकात काँग्रेसला फटका बसला असल्यामुळे एकेकाळी २६ पैकी १६ राज्यांमध्ये सत्ता असणारा काँग्रेस पक्ष केवळ दोन राज्यांमध्ये सत्तेत राहिलेला आहे. काँग्रेसकडे आता केवळ मिझोरम आणि नुकताच विजय मिळवलेले पंजाब अशी दोनच राज्ये राहिली आहेत. २०१४मध्ये काँग्रेस १३ राज्यांमध्ये सत्तेत होती. मागील चार वर्षांमध्ये १३ पैकी १० राज्यामधील निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. आता काँग्रेससाठी कर्नाटकमध्येही पराभवाची मालिका अखंड राहिल्याचे दिसत आहे.