काँग्रेसकडे चेहराच नाही त्यामुळे आता चॉकलेट चेहरे समोर आणले जात आहेत. कधी सलमान खान काँग्रेसकडून लढणार असे सांगितले जाते आहे, कधी करीना कपूरची चर्चा होते तर कधी प्रियंका गांधीना राजकारणात आणले जाते आहे अशी टीका भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियंका गांधी यांचा राजकारणात प्रवेश केला. त्या इतके दिवस राजकारणात सक्रिय नव्हत्या त्या आता सक्रिय झाल्या आहेत. प्रियंका गांधी म्हणजे आमचा हुकमी एक्का आहे असे काँग्रेसने म्हटलं आहे. अशात कैलाश विजयवर्गीय यांनी मात्र त्यांना चॉकलेट चेहरा म्हटले आहे.

तसेच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सलमान खान आणि करीना कपूर या सिनेसृष्टीतील कलाकारांना काँग्रेसकडून तिकिट दिलं जाईल आणि हे दोन कलाकार निवडणूक लढवू शकतात अशी शक्यताही वर्तवण्यात आली होती. या सगळ्यावर आता भाजपाकडून टीका करण्यात येते आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी हाच मुद्दा उपस्थित करत काँग्रेसकडे चेहरा उरलेला नाही त्यामुळेच आता चॉकलेट चेहरे समोर आणले जात आहेत अशी टीका केली आहे.