पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर सातत्याने देशातील जनतेची फसवणूक केली, असा आरोप गुरूवारी काँग्रेसकडून करण्यात आला. नोटाबंदीनंतर ९९ टक्के जुन्या नोटा बँकांमध्ये परत आल्याची माहिती बुधवारी रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली. पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट रोजी नोटाबंदीमुळे ३ लाख कोटी काळा पैसा बँकेत जमा झाल्याचा दावा केला होता. मात्र, रिझर्व्ह बँकेने काल दिलेल्या माहितीनुसार हा दावा पूर्णपणे फोल ठरला होता. त्यामुळे नोटाबंदी हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा म्हणावा लागेल. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी सातत्याने खोटी विधाने केली, असा आरोप आनंद शर्मा यांनी केला.

नोटाबंदीनंतर ९९ टक्के जुन्या नोटा बँकांमध्ये जमा; रिझर्व्ह बँकेची माहिती

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला तब्बल २.२५ लाख कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागेल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट दोषी आहेत. नोटाबंदीचा निर्णय ही चूक होती, हे सत्य जनतेने स्वीकारले असते. मात्र, हा निर्णय योग्यच होता असे सातत्याने सांगणे, हे चूक होते. नोटाबंदीमुळे जादा रक्कम येणार नाही, हे सरकारला माहीत होते. त्यामुळेच दहशतवाद्यांच्या आर्थिक रसदीसाठी वापरण्यात आलेले ४ ते ५ लाख कोटी रूपये अर्थव्यवस्थेत परत येणार नाहीत, अशी माहिती महाधिवक्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली होती. प्रत्येक टप्प्यावर सरकारकडून नोटाबंदीच्या अपयशाचे सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे हा मोठा घोटाळा ठरतो. तसेच सरकारने अनेकांना काळा पैसा पांढरा करण्यासाठी मदत केली, असा आरोपही आनंद शर्मा यांनी केला.

काहींना नोटाबंदी काय हे समजलंच नाही, जेटलींचा विरोधकांना टोला