देशाच्या जीडीपीचा दर उणे २४ वर गेल्यानंतर विरोधकांकडून सतत सरकारवर टीका होत आहे. काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सातत्यानं सरकारवर टीका करत आहे. आता पुन्हा एकदा विकास गायब है असं म्हणत राहुल गांधी यांनी एक यादी शेअर केली आहे.

“१२ कोटी रोजगार गायब, ५ ट्रिलिअन अर्थव्यवस्था गायब, सामान्य नागरिकांचं उत्पन्न गायब, देशातील आनंदी वातावरण आणि सुरक्षा गायब, प्रश्न विचारला तर उत्तर गायब, विकास गायब आहे,” असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला.

यापूर्वीही साधला होता निशाणा

भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट झालं. त्याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा आकडाही दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन मोदी मेड डिझास्टर म्हणजेच मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटे असं म्हणत देशासमोर सहा समस्यांची यादीच पोस्ट केली होती.

“भारत मोदी मेड डिझास्टरखाली दाबला गेला आहे,” या शिर्षकाखाली राहुल गांधी यांनी सहा वेगवेगळ्या समस्यांची यादी ट्विट केली आहे. यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा उणे २३.९ टक्क्यांनी आक्रसलेला जीडीपीचा दर, दुसरा मुद्दा ४५ वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारीचा दर, तिसरा मुद्दा १२ कोटी लोकांचा रोजगार बुडणे, चौथा मुद्दा केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीची रक्कम न देणे, पाचवा मुद्दा करोनाबाधितांच्या आकड्यात आणि मृत्यूमध्ये दैनंदिन पातळीवर सर्वात मोठी जागतिक वाढ भारतात असणे आणि सहावा मुद्दा भारताच्या सीमावर शेजारच्या देशांनी कुरघोड्या करण्याचा असल्याचं म्हटलं होतं.