भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था डळमळीत झाली असून, अर्थव्यवस्था आयसीयूमध्येच असल्याचं मोदी सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी म्हटलं होतं. त्यांच्याच विधानावरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंमबरम यांनी अर्थव्यवस्थेला सद्यस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला काही सल्ले दिले आहेत. या पंतप्रधान नरेंद्र मोदी पदाचा राजीनामा देऊ शकतात, असा एक सल्ला त्यांनी दिला आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंमबर यांनी ‘द वीक’ला दिलेल्या मुलाखतीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीला मोदी सरकारला जबाबदार धरले आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात असला तरी अर्थव्यवस्थेची स्थिती किती वाईट आहे?, असा प्रश्न चिदंबरम यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना चिदंबरम म्हणाले, “माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्य यांनी अर्थव्यवस्थेची अवस्थेविषयी बोलताना अर्थव्यवस्था आयसीयूत असल्याचं म्हटलं आहे. सुब्रमण्यम यांनी एका वर्षापूर्वीच पद सोडलं आहे. ज्या समस्या होत्या त्या नीटपणे समजून घेण्यात आल्या नाहीत, असं त्यांनी म्हटलं होतं आणि आज अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. मग आता या सरकारला किती दोषी ठरवायचे,” असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने काही पाऊलं उचलली आहेत, ती पुरेशी आहेत का? या प्रश्नांवर बोलताना चिदंबरम म्हणाले, “कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यासह जे उपाय सरकारनं केले आहेत, ते त्यांच्या जवळ असलेल्या उद्योजकांना मदत करणारे आहेत. खरतर ज्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत गेले. नोकऱ्या गेल्या. कमी उत्पन्न असणाऱ्यांना मदत करण्याची ही वेळ आहे. तळाला असणाऱ्या २५ ते ३५ कामगार वर्गाला मदत करण्याची वेळ आहे. पण, सरकारनं केवळ ८०० कंपन्यांना सरकारनं मदत केली,” असं चिदंबरम यांनी सांगितलं.

सध्याच्या परिस्थतीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी काय करण्याची गरज आहे, असा प्रश्न चिदंबरम यांना विचारण्यात आला. त्यावर सल्ला देताना चिदंबरम म्हणाले, “एक चांगली गोष्ट अशी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देऊ शकतात. जर ते राजीनामा देणार नसतील, तर दुसरा उपाय म्हणजे सरकारनं पैसे देऊन तज्ज्ञांना सल्ला घ्यावा. नेमकी समस्या काय आहे, हे तरी ते सांगतील. कारण अर्थव्यवस्थेच्या बिघाडीविषयी या सरकारला कोणतीही कल्पना नाही. ते चुकीच्या विषयांना प्राधान्य देत आहेत. चुकीची कर कपात करत आहेत,” अशी टीका चिदंबरम यांनी केली.