वादग्रस्त शेती कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा सातत्यपूर्ण संघर्ष आणि दिल्ली गाठण्याच्या निर्धारासमोर नमतं घेत शुक्रवारी अखेर केंद्र सरकारनं आंदोलकांना दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी दिली. तसंच दिल्लीच्या उत्तर-पश्चिम टोकाला असलेल्या बुराडी येथील निरंकारी मैदानावर शांततेनं निदर्शन करण्याची मुभा देण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी शेतकऱ्यांचे जथे येऊ लागले होते. दरम्यान, आंदोलनातील एक फोटो शेअर करत काँग्रेचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. शनिवारी काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. एकीकडे राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकारची कारवाई ही पंतप्रधानांचा अहंकार असल्याचं म्हटलं. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गाँधी यांनी भाजपावर आरोप करत भाजपा सरकार आपल्या अब्जाधीश मित्रांसाठी सर्वकाही करतात परंतु जर शेतकरी दिल्लीत येत असतील तर त्यांच्या मार्गांवर अडथळे निर्माण केले जात जातात, असं म्हणत निशाणा साधला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. "हा खुपच दु:खद फोटो आहे. आम्ही जय जवान जय किसानची घोषणा दिली होती. परंतु पंतप्रधानांच्या अहंकारानं जवानांना शेतकऱ्यांच्या विरोधात आणून उभं केलं आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे. बड़ी ही दुखद फ़ोटो है। हमारा नारा तो ‘जय जवान जय किसान’ का था लेकिन आज PM मोदी के अहंकार ने जवान को किसान के ख़िलाफ़ खड़ा कर दिया। यह बहुत ख़तरनाक है। pic.twitter.com/1pArTEECsU — Rahul Gandhi (@RahulGandhi) November 28, 2020 तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला. "भाजपा सरकारच्या काळात देशातील परिस्थिती पाहा. जेव्हा भाजपाचे अब्जाधीश मित्र दिल्लीत येतात तेव्हा त्यांच्यासाठी लाल चादर पसरली जाते. परंतु शेतकऱ्यांना दिल्लीत येताना रस्त्यात अडथळे निर्माण केले जातात. त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे तयार केले ते चालतं. परंतु सरकारसमोर ते आपलं म्हणणं मांडण्यासाठी आले तर ते चुकीचं?," असं म्हणत प्रियंका गांधी यांनीही सरकारवर टीकेचा बाण सोडला. भाजपा सरकार में देश की व्यवस्था को देखिए जब भाजपा के खरबपति मित्र दिल्ली आते हैं तो उनके लिए लाल कालीन डाली जाती है। मगर किसानों के लिए दिल्ली आने के रास्ते खोदे जा रहे हैं। दिल्ली किसानों के खिलाफ कानून बनाए वह ठीक, मगर सरकार को अपनी बात सुनाने किसान दिल्ली आए तो वह गलत? pic.twitter.com/rm7CFmaWAL — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 28, 2020 ‘संयुक्त किसान मोर्चा’ या बॅनरखाली पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान केरळ, महाराष्ट्र अशा विविध राज्यांतील पाचशे शेतकरी संघटना एकत्र आल्या होत्या. तर दुसरीकडे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी करोनाच्या काळातील हे आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी संघटनांना चर्चेसाठी ३ डिसेंबरला बोलावले असल्याचा तोमर यांनी पुनरुच्चार केला.