काही महिन्यांपासून करोनाच्या कोडींत सापडलेल्या जगभरातील नागरिकांना ब्रिटनमध्ये आशेचा किरण दिसला. ब्रिटनने फायझर बायोएनटेकच्या लसीला परवानगी दिली. ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू होणार असलं, तरी करोनावर लस आली या बातमीनं करोनाविरोधातील लढाईला बळ दिलं आहे. देशात लस आल्यानंतर वितरण कसं करायचं याची तयारीही सरकारनं सुरू केली आहे. त्यामुळे प्रत्येकाला करोनाची लस मिळणार असं म्हटलं जात होतं. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहिती पुन्हा चलबिचल सुरू झाली आहे. प्रत्येक भारतीयाला लस देण्याबद्दल सरकारकडून म्हटलं गेलेलं नाही, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं होतं. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

“पंतप्रधान म्हणतात सर्वांना लस मिळणार. बिहार निवडणुकांच्या वेळी बिहारमध्ये सर्वांना मोफत करोना लस दिली जाणार असल्याचं म्हटलं गेलं. आता केंद्र सरकरा म्हणत सर्वांना लस देणार असं कधी म्हटलंच नाही. पंतप्रधानांची नक्की भूमिका काय?,” असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट करत सरकावर निशाणा साधला.

आणखी वाचा- साखळी तुटली, तर प्रत्येकाला करोनाची लस देण्याची गरज नाही – आयसीएमआर

लसीबद्दल काय दिलं होतं स्पष्टीकरण?

देशातील करोनाची साखळी तोडण्यात यश आलं, तर प्रत्येक नागरिकाला लस देण्याची गरज पडणार नाही,” अशी माहिती अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे अध्यक्ष बलराज भार्गवा यांनी दिली होती. ”मी आधी स्पष्ट करतोय की, देशभरात लसीकरण करण्यात येईल, असं सरकारनं कधीही म्हटलेलं नाही. त्यामुळे आपण केवळ वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारावरच अशा वैज्ञानिक विषयांवर चर्चा करायला हवी, हे महत्त्वाचे आहे,” असं आरोग्य सचिव म्हणाले होते.

”आपले उद्देश करोनाची साखळी तोडण्याचा आहे. त्यामुळे लसीकरण लसीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असणार आहे. जर आपण गंभीर लोकांचं लसीकरण करण्यास आणि विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो, तर आपल्याला देशातील संपूर्ण लोकसंख्येला लस देण्याची गरज नाही,” असं भार्गवा यांनी यांनी स्पष्ट केलं होतं.