काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. करोना, जीएसटी, लॉकडाउन, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, अर्थव्यवस्था यासारख्या अनेक विषयांवर त्यांनी गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. केंद्र सरकारच्या ‘अब की बार मोदी सरकार’ या घोष वाक्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

“अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार” असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. त्याचबरोबर ‘अबकी बार करोडो बेरोजगार’ यासाठी हॅशटॅग वापरला. राहुल गांधी यांनी ट्वीट केल्यानंतर कमेंट्स बॉक्समध्ये काँग्रेस आणि भाजपा पक्षातील कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

यापूर्वीही ‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. या ट्वीटसोबत त्यांनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्या आरोपांचा दाखला दिला होता. त्यांनी करोनाच्या उपलब्ध मात्रा आणि जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली यांचा कुठेही तालमेल लक्षात ठेवला नसल्याचा संदर्भ दिला होता.

“मोदी सरकारने शरियतमध्ये हस्तक्षेप केल्याने करोना, चक्रीवादळांसारखी नैसर्गिक संकटं आली”; सपा खासदाराचे वक्तव्य

गेल्या काही दिवसात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्याच पक्षाचे काही नेते, काही मित्र आणि काही पत्रकारांना अनफॉलो केलं आहे. यामध्ये वायनाडच्या कार्यालयातले काही लोक आणि दिल्लीतल्या काही ज्येष्ठ पत्रकारांचाही समावेश आहे. राहुल यांच्या या कृतीची सोशल मीडियावर तसंच राजकीय वर्तुळांमध्येही जोरदार चर्चा आहे.