काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी ज्यांना आपण गमावलं तसंच आपली सुरक्षा करत बलिदान दिलं आहे त्यांचा उल्लेख केला आहे. परदेशात गेलेल्या राहुल गांधी यांनी रात्री ट्विट करत नववर्षाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्याविरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांचाही उल्लेख केला आहे. "नवीन वर्ष सुरु होत असताना ज्यांना आपण गमावलं आहे त्यांची आठवण काढत आहोत. तसंच ज्यांनी आपली सुरक्षा केली आणि बलिदान दिलं त्या सर्वांचे आभार मानत आहोत. मी मान आणि सन्मानाने अन्यायाविरोधात लढणाऱ्या शेतकरी आणि कामगारांसोबत आहे. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा". As the new year begins, we remember those who we lost and thank all those who protect and sacrifice for us. My heart is with the farmers and labourers fighting unjust forces with dignity and honour. Happy new year to all. pic.twitter.com/L0esBsMeqW — Rahul Gandhi (@RahulGandhi) December 31, 2020 राहुल गांधी यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. गेल्या एका महिन्यापासून पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांमधील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द व्हावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आतापर्यंत सहावेळी शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा झाली आहे. पण अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरुन अनेकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. २४ डिसेंबरला याच मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्या यावेळी त्यांनी राष्ट्रपतींसमोर मांडल्या. आणखी वाचा- कृषी कायद्यांविरोधात केरळ सरकारने मंजूर केला ठराव; भाजपाच्या एकमेव आमदाराचाही पाठिंबा रविवारी राहुल गांधी भारताबाहेर गेल्याने टीकेला सामोरं जावं लागलं होतं. देशात शेतकरी आंदोलन सुरु असताना आणि काँग्रेसचा स्थापना दिवस असतानाच राहुल गांधी देशाबाहेर गेल्याने भाजपा नेत्यांनी टीका केली होती. राहुल गांधी आजी आजारी असल्याने इटलीला गेल्याचं काँग्रेस नेते राजीव सातव यांनी सांगितलं होतं.