काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राज बब्बर यांनी राजीनाम्याचे कारण दिलेले नाही. मात्र, पक्षनेतृत्वाने अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षात तरुणांना संधी दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. यानंतर गोव्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी राजीनामा दिला होता. तर गुजरातचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनी देखील राजीनामा दिला. सोलंकी यांनी राजीनाम्यामागे परदेश यात्रेचे कारण सांगितले होते. या दोघांच्या राजीनाम्यानंतर राज बब्बर यांनी देखील मंगळवारी रात्री उशीरा राजीनामा दिला. त्यांनी राजीनाम्याचे कारण दिलेले नाही. त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. पक्षनेतृत्वाने राजीनामा स्वीकारेपर्यंत राज बब्बर उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्षपदाची धूरा सांभाळतील.

राजीनाम्यानंतर राज बब्बर म्हणाले, मला उत्तर प्रदेशमध्ये पक्षाने एक जबाबदारी दिली होती. मला जेवढं शक्य होतं तेवढं काम मी केले. यात कधी मला यश आले तर कधी अपयश. मी याबाबत आणखी भाष्य करणार नाही. माझ्या कामगिरीचा आढावा पक्षनेतृत्वच घेईल, असे त्यांनी सांगितले. २०१९ च्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाची भूमिका बदलण्याची गरज आहे. पक्षात कोणाची भूमिका काय असेल हे आता पक्षनेतृत्व ठरवेल, असे त्यांनी नमूद केले.

राज बब्बर यांच्या राजीनाम्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी काही नावेही चर्चेत आली आहेत. काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद, माजी खासदार राजेश मिश्र आणि माजी आमदार ललितेशपती त्रिपाठी यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. एक प्रदेशाध्यक्ष व चार उपाध्यक्ष असे समीकरण घेऊन काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये मैदानात उतरले, असे सांगितले जाते.