सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. झारखंड लिंचिंग आणि हिंसाचाराचा कारखाना बनला असून दर आठवड्याला तिथे दलित आणि मुस्लिमांची हत्या होत असल्याची टीका गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींकडे नवीन भारत तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला आमचा जुना भारत द्या अशी मागणीही केली. ते राज्यसभेत बोलत होते.

‘झारखंड लिंचिंग आणि हिंसाचाराची फॅक्टरी झाली आहे. दलित आणि मुस्लिमांची दर आठवड्याला हत्या होत आहे. प्रधानमंत्रीजी आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’च्या लढाईत तुमच्यासोबत आहोत. पण हे लोकांना दिसलं पाहिजे. आम्ही ते पाहू शकत नाही आहोत’, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

पुढे त्यांना सांगितलं की, ‘मी तुम्हाला विनंती करतो की, नवीन भारत तुमच्याकडेच ठेवा आणि आम्हाला आमचा जुना भारत परत करा. जिथे प्रेम, संस्कृती होती. जर मुस्लिम आणि दलितांना काही ठेस लागली तर हिंदूंनाही यातना व्हायच्या. जेव्हा एखादी गोष्ट हिंदूंच्या डोळ्यात जायची तेव्हा मुस्लिम आणि दलित त्यांच्यासाठी अश्रू ढाळायचे’.

‘जुन्या भारतात द्वेष, राग आणि लिचिंग असे प्रकार नव्हते. नवीन भारतात माणुसच माणसाचा शत्रू आहे. तुम्ही जंगलात एखाद्या प्राण्याला घाबरणार नाहीत, पण कॉलनीतील लोकांना घाबरता. आम्हाला तो भारत परत करा जिथे हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन गुण्या गोविंदाने एकत्र राहायचे’, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.