भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यात काँग्रेसने कोणतीच कसर सोडली नव्हती असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा नष्ट व्हावा यासाठी काँग्रेसने प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नवी दिल्लीतील अलीपूर रोडवर डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘डॉ बाबासाहेब यांच्या सर्व आठवणी इतिहासातून पुसल्या जाव्यात यासाठी काँग्रेसने पुरेपूर प्रयत्न केले. हे कठोर सत्य आहे, पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकर जिवंत होते तेव्हा त्यांचा अपमान करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, सोबतच त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यायला लावला असंही यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना एकाही कॅबिनेट समितीत सहभागी करुन न घेण्यात आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.

‘काँग्रेसने देशाच्या इतिहासात बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख नसावा यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली. माझं काँग्रेसला आव्हान आहे की, त्यांनी बाबासाहेबांसाठी केलेलं एक काम तरी सांगावं. त्यांच्या आदरार्थ एक तरी काम काँग्रेसने केलं का ?’, असा प्रश्न मोदींनी यावेळी विचारला.

पुढे बोलताना मोदींनी सांगितलं की, ‘जेव्हा बाबासाहेब आंबेडकर लोकसभा निवडणूक लढणार होते तेव्हा काँग्रेसने त्यांचा पराभव करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली’. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी जोरात प्रचार केला असा आरोपी मोदींनी केला.