राजस्थानात सत्तासंघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे गेहलोत सरकारच्या स्थिरतेलाच धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान आता जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरु आहे. या बैठकीला १०२ आमदार उपस्थित असून त्यांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी केली आहे. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

बंडखोर सचिन पायलट आणि बैठकीला अनुपस्थित असलेल्या अन्य आमदारांवर कारवाई करण्याचा ठराव काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत करण्यात आल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

काँग्रेसमधील सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने सचिन पायलट यांनी स्वत:साठी मुख्यमंत्रीपद मागितल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय सचिन पायलट यांनी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे यांना हटवण्याची आणि महत्त्वाच्या पदांवर आपल्या माणसांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.