पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या काँग्रेसने केलेल्या एका नव्या कृतीमुळे पुन्हा एकदा पक्षावर टीका होऊ लागली आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेस आमदारांकडून तेथील प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यास सुरुवात केली असून, त्यामध्ये ‘पक्षाचे आमदार म्हणून आपण विनाअट आपली निष्ठा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याप्रती समर्पित करतो’, अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.
थेट पक्षाच्या आमदारांकडून १०० रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर हा मजकूर लिहून घेण्यात आला. त्यामुळे आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर आणि पक्षावर टीका होऊ लागली.
काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांनी या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली असून, विनाअट आपली निष्ठा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याप्रती समर्पित करीत असल्याचे म्हटले आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण चार मुद्दे आहेत. त्यापैकी एक मुद्दा हा पक्षाध्यक्षांवरील निष्ठेचा आहे. पक्षाच्या आमदारांनी कोणतीही पक्षविरोधी कारवाई करू नये, असाही एक मुद्दा या प्रतिज्ञापत्रामध्ये घालण्यात आला आहे.