भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष विखारी असल्याचे वक्तव्य केल्याने काँग्रेसने त्याची गंभीर दखल घेतली असून मोदी, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे व भाजपच्या अन्य एका नेत्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या विधी कक्षाचे सचिव के. सी. मित्तल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्याकडे याबाबत सविस्तर तक्रार नोंदविली आहे. गेल्या सहा दशकांपासून काँग्रेसने सत्ता उपभोगली असल्याने त्यांच्यात सत्तेचे विष भिनलेले आहे. त्यामुळे काँग्रेस वगळता अन्य कोणताही पक्ष विष पसरवू शकत नाही, असे वक्तव्य मोदी यांनी २५ नोव्हेंबर रोजी केले होते.सत्ता ही विषाप्रमाणे असते, असे आपल्याला आईने सांगितल्याचे वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. त्यामुळे मोदी यांचा इशारा राहुल गांधी यांच्याकडेच होता, असे मानले जात आहे. जयपूरमध्ये चर्चासत्रात वसुंधराराजे यांनी, औषधांच्या नावावर विष देण्यात येत असल्याचे वक्तव्य केले होते. जनतेला विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी राजस्थानमधील काँग्रेस सरकारने योजना आखली होती त्याचा संदर्भ वसुंधराराजे यांनी दिला होता.