काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी बैठकीत २३ जूनला निवडणूक होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. तसेच अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ जून असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र करोनाचं कारण देत पुन्हा एकदा निवडणूक टाळण्यात आली आहे. तारीख जाहीर झाल्याच्या अवघ्या काही तासातच निर्णय बदलण्यात आला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदा टाळण्यात आली आहे. त्यामुळे पुढची तारीख जाहीर होईपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद राहाणार आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधी यांच्यावर बोट दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान राहुल गांधी यांचं मन वळवण्याचे अनेकांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे नवा अध्यक्ष मिळेपर्यंत हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आलं आहे. राहुल गांधी १६ डिसेंबर २०१७ ते १० ऑगस्ट २०१९ या कालावधीत काँग्रेसचे अध्यक्ष होते.

“भाजपा सरकार करोनाबळींचे खोटे आकडे दाखवतंय”

पाच राज्यातील निवडणुकांमध्ये पक्षाच्या कामगिरीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होण्याची संकेत मिळत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत बैठकांमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. २०१४ पासून काँग्रेसची कामगिरी खालावत असल्याची टीका होत आहे. काँग्रेसच्या २३ नेत्यांनी थेट गांधी घरण्याला आव्हान दिल्याने निवडणूक अटल आहे. त्यामुळे यंदा काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता मावळली आहे. काँग्रेसला गांधी घरण्याऐवजी नवं नेतृत्व मिळाल्यास २०२४च्या लोकसभा निवडणुकीत तगडं आव्हान मिळू शकतं असं काँग्रेसमधील एका गटाचं म्हणणं आहे.