देशात करोनाने कहर केला असताना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याने काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. करोनाची दुसरी लाट येणार असल्याचं माहिती असतानाही सुविधा निर्माण करण्यात का आल्या नाहीत? अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे. तसंच लसी परदेशात पाठवल्या म्हणूनच आपल्याकडेच तुटवडा जाणवत असल्याचं सांगताना देशवासियांना प्राधान्य का देण्यात आलं नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. "आज देशभरातून बेड्स्, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरची कमतरता असल्याचे रिपोर्ट येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान आपल्याकडे तयारीसाठी खूप वेळ होता. आपला देश ऑक्सिजनची निर्मिती करणारा सर्वात मोठा देश आहे. मग ऑक्सिजनची कमतरता का जाणवत आहे. कारण त्याची वाहतूक करण्याची सुविधा तयार करण्यात आलेली नाही," अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. आणखी वाचा- …आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार -राहुल गांधी "तुमच्याकडे आठ ते नऊ महिने होते. दुसरी लाट येणार सांगत असतानाही तुम्ही दुर्लक्ष केलं. युद्धपातळीवर काम करत तुम्ही सुविधा निर्माण करु शकत होता. आज देशात फक्त २००० ट्रक ऑक्सिजनची वाहतूक करु शकतात. देशात ऑक्सिजन आहे, पण जिथे पोहचण्याची गरज आहे पोहोचत नाही," अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. "रेमडेसिवीरसाठी लोक वणवण फिरत आहेत. गेल्या सहा महिन्यात १० लाखांहून अधिक रेमडेसिवीरची निर्यात करण्यात आली. सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली. त्याचवेळी देशात तीन ते चार कोटी लोकांना लस देण्यात आली. तुम्ही देशवासियांना प्राधान्य का दिलं नाही? कारण तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. मॉरिशिअस, नेपाळला लस जात असल्याचं आम्ही टीव्हीवर पाहत होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लस दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच आज तुटवडा जाणवत आहे," अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. आणखी वाचा- करोना लसीकरणावरुन केरळ आणि केंद्र सरकार आमने-सामने; विजयन यांचं मोदींना पत्र #WATCH | Congress Gen Secy Priyanka Gandhi Vadra speaks to ANI, says ". 1.1 mn Remdesivir injections exported in last 6 months. Today we face shortage. Govt exported 6 cr vaccines b/w Jan-March. During this time 3-4 cr Indians were vaccinated. Why were Indians not prioritised?" pic.twitter.com/3ueFTZo6MS — ANI (@ANI) April 21, 2021 "रुग्णलयांमध्ये सुविधा का वाढवली नाही. हे सरकारचं अपयश आहे. आजदेखील ते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. स्टेजवर जाऊन हसत आहेत. देशभरात लोक मदत मागत असताना, रडत असताना तुम्ही हसू कसं शकता," अशी विचारणा प्रियंका गांधींनी नरेंद्र मोदींना केली. इतकी गर्दी एकत्र येत असताना निवडणूक रॅलींमध्ये जाऊन कोणी चाचणी करतंय का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आणखी वाचा- १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण; योगी सरकारचा निर्णय #WATCH | Congress Gen Secy Priyanka Gandhi Vadra speaks to ANI, says, ".PM needs to show up. He needs to get off the stage of the rally where is laughing and cracking jokes. He needs to come here, sit in front of people, talk to them and tell them how is he going to save lives" pic.twitter.com/aPlH6eSl3S — ANI (@ANI) April 21, 2021 "करोनाच्या लढाईत आपण एकत्र आहोत. जी मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तयार आहोत. सर्वासमोर मोठं सकंट असून शक्य असेल तितकं सकारात्क, कुटुंबाची मदत करु शकतो तितकं चांगलं आहे. असंच आपण या महामारीच सामना करु शकतो," असं आवाहन प्रियंका गांधी यांनी यावेळी देशवासियांना केलं.