लडाखमध्ये सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीमुळे भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या संघर्षावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहीद जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी पाठवलं? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकारला जबाबदार कोण ? अशी विचारणा करणारा १८ सेकंदांचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विटरला शेअर केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, “चीनने भारताच्या विनाशस्त्र जवानांची हत्या करुन खूप मोठा गुन्हा केला आहे. मला विचारायचं आहे की, शहीद झालेल्या आपल्या जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी आणि का पाठवलं? यासाठी जबाबदार कोण?”. कौन ज़िम्मेदार है? pic.twitter.com/UsRSWV6mKs — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2020 याआधी राहुल गांधी यांनी लडाखमध्ये नेमकं काय सुरु आहे याची माहिती केंद्र सरकारने द्यावी अशी मागणी केली होती. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना भाजपाने उत्तर दिलं असून देशवासियांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. Sharing the video of today’s Press Conference on Rahul Gandhi’s misinformations: — Sambit Patra (@sambitswaraj) June 18, 2020 भाजपा नेते संबित पात्रा यांनी राहुल गांधींना काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या कराराची आठवण करुन दिली आहे. १९९६ मध्ये झालेल्या करारांचा उल्लेख करताना संबित पात्रा यांनी म्हटलं आहे की, “जर तुम्ही शिकलेले नसाल, काही माहिती नसेल तर लॉकडाउनचा फायदा घेत घरात काही पुस्तकं वाचली पाहिजेत. सोबतच काँग्रेसच्या कार्यकाळात चीनसोबत झालेल्या करारांबद्दलही वाचलं पाहिजे”. या करारात दोन्ही बाजूंनी कोणतीही फायरिंग केला जाणार नाही, स्फोटकांचा वापर होणार नाही तसंच शस्त्र घेऊन सैनिकही नसतील यावर सहमती झाली होती.