आगामी दिवसांमध्ये संकट अजून गहिरं होणार असून तरुणांना रोजगार मिळणं कठीण होणार आहे अशा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी व्हर्च्यूअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका केली. पुढील सहा ते सात महिन्यात देशासमोर रोजगार संकट उभं राहणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. करोनासंबंधी इशारा दिल्यानंतर मीडियाने आपली खिल्ली उडवली होती अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

“भारत तरुणांना नोकरी देण्यात असमर्थ ठरणार आहे. हे स्पष्ट आहे. देश तरुणांना रोजगार देऊ शकत नाही असं याआधी गेल्या ७० वर्षात कधीही झालेलं नाही,” अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.

“करोनामुळे मोठं नुकसान होईल असं मी सांगितलं असता मीडियाने माझी खिल्ली उडवली. जर तुम्हाला विश्वास नसेल तर माझं ऐकू नका. मी आज सांगतोय की, भारत तरुणांना नोकरी देऊ शकणार नाही. जर तुम्हाला पटत नसेल तर पुढील सहा ते सात महिने वाट पाहा,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

यामागील कारण सांगताना राहुल गांधींनी म्हटलं आहे की, असंघटित नोकरी देऊ शकणाऱ्यांना अर्थव्यवस्थेने संपवलं आहे. “९० टक्के रोजगार असंघटित क्षेत्रात आहे. छोट्या कंपन्या, शेतकरी…सर्व व्यवस्थाच मोदींनी संपवली आहे. एकामागोमाग एक कंपन्यात बंद होत आहेत. लघु आणि मध्यम उद्योगही कर्जाच्या हफ्ते फेडण्यात मिळालेली सूट संपल्यानंतर नष्ट होतील,” असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे.