जम्मू-काश्मीरच्या कथुआ व सांबा जिल्ह्य़ात घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटना सुरक्षा दलांचा निर्धार मोडू शकणार नाहीत, असे सांगून काँग्रेसने शनिवारी या हल्ल्यांचा निषेध केला. केंद्र सरकार पाकिस्तानबाबत ‘मवाळ’ असल्याचा आरोपही पक्षाने केला.
असे हल्ले करून दहशतवादी त्यांचे अस्तित्व दाखवून देऊ इच्छितात. मात्र, अशा घटना सुरक्षा रक्षकांचा निग्रह मोडू शकत नाहीत याची त्यांच्या सूत्रधारांना (पाकिस्तान) आठवण करून देण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे नेते व माजी मंत्री शामलाल शर्मा म्हणाले.
या हल्ल्यांचा उल्लेख ‘निर्लज्ज’ असा करून शर्मा म्हणाले की, पाकिस्तानने अशा कृत्यांना पाठिंबा देण्याऐवजी स्वत:च्या अंतर्गत कारभारात लक्ष घालावे.
नरेंद्र मोदी सरकार कुठलेही गांभीर्य दाखवत नसून ते पाकिस्तानबाबत अतिशय मवाळ असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला. भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानने सुमारे ८४६ वेळा युद्धबंदी कराराचा भंग केला असल्याचे त्यांनी सांगितले.