सरकारविरोधात कारस्थान असल्याचा अर्थमंत्री जेटली यांचा आरोप

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेवरून कानपिचक्या दिल्या असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारची बाजू ठामपणे मांडली आहे. काँग्रेस व डावे विचारवंत तसेच काही सामाजिक कार्यकर्ते यांना भाजप सत्तेत आलेले सहन झालेले नाही. त्यामुळेच भाजप व पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वैचारिक असहिष्णुता दाखवली जात आहे, अशा शब्दांत जेटलींनी समाज माध्यमांवरून सरकारवरील टीकेला उत्तर दिले आहे.
राजन यांनी शनिवारी दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना देशातील वाढत्या असहिष्णुतेवर भाष्य केले होते. या पाश्र्वभूमीवर जेटली यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले आहे. जेटली पुढे म्हणतात, जे लोक असहिष्णुतेबाबत प्रचार करीत आहेत त्यांना आमच्याशी राजकीय पातळीवर लढता येत नाही, त्यामुळे ते विखारी टीका करत आहेत. त्यांनाच वैचारिक मतभिन्नता मान्य नाही. खरे तर हीच मंडळी असहिष्णू आहेत. काही ठिकाणी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व सांस्कृतिक संस्थांवर त्यांचे वर्चस्व असून, तिथे दुसऱ्यांचे मतही विचारात ही मंडळी घेत नाहीत, असा आरोप जेटलींनी केला. दादरीची घटना दुर्दैवी होती. त्याला जबाबदार असणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, पण अशा घटना अपवादाने घडतात. पुरस्कार वापसी हे भाजप विरोधकांचे कृत्य आहे. संसदेत काम करू द्यायचे नाही व सुधारणा राबवू द्यायच्या नाहीत असे त्यांचे दुहेरी डावपेच असल्याचा आरोपही जेटली यांनी केला.
अमजद अली खान नाराज
प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या आपल्या पक्षाच्या सदस्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगाम घालावा, अन्यथा देशातील शांतता धोक्यात येईल असे सांगून प्रख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांनी देशातील ‘वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध’च्या वाढत्या विरोधात आपला आवाज मिसळला आहे.

पंतप्रधान मोदी २००२ पासून वैचारिक असहिष्णुतेचे शिकार ठरले आहेत. आताही भारतातील समाज असहिष्णू असल्याचा खोटा प्रचार पद्धतशीरपणे सुरू आहे. देश व सरकारच्या हितचिंतकांनी वातावरण गढूळ करणारी विधाने करून आर्थिक विकासात अडथळे आणू नयेत. – अरुण जेटली

जेटली म्हणाले

’भारत हा सहिष्णू व उदार
समाज असलेला देश आहे. आपली सांस्कृतिक मूल्ये ही सहअस्तित्वावर आधारित आहेत.
’भारताने नेहमीच असहिष्णुता नाकारलेली आहे, प्रक्षोभक गोष्टींना थारा दिलेला नाही.
’दादरीची घटना दुर्दैवी होती निषेधार्हही आहे. त्याला जबाबदार असणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, पण अशा घटना अपवादाने घडतात.

जेटली यांची प्रतिक्रिया हास्यास्पद -काँग्रेस : पंतप्रधान नरेंद्र मोदी वैचारिक असहिष्णुतेचे बळी ठरल्याचे वक्तव्य करणारे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर काँग्रेसने हल्ला चढवला आहे. जेटली यांनी मोदींना खूष करण्यासाठी हे वक्तव्य केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.