उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे हे आंदोलन असणार आहे. तसेच, पक्षाच्या जिल्हा मुख्यलयाच्या ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ ३१ ऑक्टोबर रोजी आंदोलन केले जाणार असल्याची देखील माहिती, काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा सध्या सीबीआयकडून तपास सुरू आहे. शनिवारी सीबीआयच्या पथकाने पुन्हा एकदा पीडितीचे गावास भेट दिली व पीडित कुटुंबाची चौकशी केली व घटनास्थळाची पाहणी केली.

या घटनेवरून काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत, त्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे म्हटले होते. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील यावरून मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे.

देशातील दलित बंधू-भगिनींवर अत्याचार होत आहेत. कायद्याचा सन्मान करण्या ऐवजी, मुलींना सुरक्षा देण्या ऐवजी भाजपा सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. पीडित कुटुंबांचा आवाज दाबला जात आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे. देशाची लोकशाही कठीण काळातून जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.