राहुल गांधींवर सध्या भाजपाच्या नेत्यांकडून टीकेचा भडीमार सुरू आहे. यावर काँग्रेसने काही भाष्य केले नसते तरच नवल. काँग्रेसने एक #JanKiBaat असा हॅशटॅग ट्विट करत एक व्यंगचित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. ज्यामध्ये सगळे भाजपा नेते राहुल गांधींवर टीका करत आहेत. भजनी मंडळात हे सगळे नेते राहुल ‘राग’ आळवत आहेत असे दाखवण्यात आले आहे. राहुल गांधी यांचे आमच्यासाठी काहीही महत्त्व नाही, सगळ्यांनी राहुल म्हणा, पात्रा, जेटली सीतारामन, उमाभारती सगळ्यांनी राहुल गांधींवर टीका करा असा संदेश दिला जात असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. भाजपा भजन मंडळ असे नावही देण्यात आले आहे. ‘ऐसी लागी अगन, मच गयी है जलन भाजपा घडी घडी राहुल राहुल गाने लगी’ असे शीर्षक देत काँग्रेसने हे व्यंगचित्र पोस्ट केले आहे.

राफेल करारावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल अंबानींचा फायदा करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात फेरबदल केले. तसेच नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ज्यानंतर भाजपाकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरु आहे. अशात आता राहुल गांधी यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाच राहुल ‘राग’ आळवत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.