देशातील सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत लोकांचं मोठ्या शहरांमधून गावांकडे स्थलांतर होऊ लागलं आहे. दरम्यान, त्यांच्याकडील संपर्काचे एकमेव साधन असलेल्या मोबाईलमधील बॅलन्सही संपल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी एक महिन्यासाठी मोफत कॉलिंगची सुविधा द्यावी, अशी मागणी काँग्रेसने मोबाईल ऑपरेटर कंपन्यांकडे केली आहे.

याबाबत माहिती देताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा म्हणाल्या, “देशातील सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत स्थलांतरितांच्या मदतीसाठी टेलिकॉम कंपन्यांनी एक महिन्यासाठी मोफत इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्सची सुविधा द्यावी अशी मागणी काँग्रेसने या टेलिकॉम कंपन्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

त्यासाठी काँग्रेसने मुकशे अंबानी (जिओ), कुमार मंगलम बिर्ला (वोडाफोन-आयडिया), पी. के. पुरुवाल (बीएसएनएल) आणि सुनिल भारती मित्तल (एअरटेल) या टेलिकॉम कंपन्यांच्या प्रमुखांना आवाहन करणारे पत्र लिहिले आहे.

लॉकडाऊनमुळे देशात सध्या सर्व उद्योग आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे कामाच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झालेले लोक पुन्हा आपल्या गावांकडे पायी जायला निघाले आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर स्थालंतर सुरु झाल्याने यावर काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या गंभीर स्थितीचा सामना करण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांना वेगाने उपाययोजना करण्यासाठी सोनिया गांधी यांनी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे.