उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने एकत्र येत निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सर्व 80 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी पक्ष मुख्यालयात काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी गुलाम नबी आझाद, प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांच्यासह पक्षाच्या मोठ्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. आम्ही राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवू आणि भाजपाचा पराभव करु. आमची पूर्ण तयारी झाली असून निवडणुकांचे निकाल आश्यर्यकारक असतील असं गुलाम नबी आझाद म्हणाले.
संसदेत काँग्रेस आणि भाजपामध्ये लढाई आहे हे सर्व जगाला माहितीये, ज्यांना आमची मदत करायची असेल त्या पक्षांची मदत आम्ही नक्कीच घेऊ. या लढाईत आमची मदत करणाऱ्या सगळ्यांचा आम्ही सन्मान करतो, असंही आझाद म्हणाले. ‘भाजपला हरविण्यासाठी जे पक्ष लढत आहेत त्या सर्वांशी आम्ही युती करायला तयार होतो मात्र सपा बसपाने त्यांचे मार्ग वेगळे केले. त्यांनी युती तोडली. त्यामुळे आता तो विषय संपला. आम्ही कुणाला जबरदस्ती नाही करू शकत त्यामुळे आता आम्ही एकटेच लढणार. आम्ही संपूर्ण तयारीनिशी निवडणूकीत उतरणार. 2009 मध्ये जसा काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये 1 नंबरचा पक्ष ठरला होता तसेच आताही आम्ही एकटे लढू व त्यावेळी जिंकलेल्या त्यापेक्षा दुपट्ट जागांवर निवडून येऊ’ असेही यावेळी आझाद यांनी पत्रकारांना सांगितले.


उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे एकत्र आले असून या महाआघाडीत त्यांनी काँग्रेसला स्थान दिलेले आहे. या महाआघाडीत सपा- बसपा प्रत्येकी ३८ जागांवर लढणार आहे. तर दोन जागा महाआघाडीत सामील होणाऱ्या पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत.