राहुल गांधी यांचे आश्वासन

वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) ज्या व्यापारी, ग्राहक आणि अन्य घटकांना फटका बसला आहे त्यांना २०१९ मध्ये आपले सरकार केंद्रात आल्यावर दिलासा मिळेल असे बदल आम्ही या करप्रणालीत करणार असल्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.

काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशमध्ये भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला त्यावरही राहुल गांधी यांनी हल्ला चढविला. हिमाचल प्रदेशमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत भ्रष्टाचाराचे प्रमाण खूप कमी असल्याचे निती आयोगाच्या अहवालांत म्हटले असल्याचा दावा गांधी यांनी केला. विकासाच्या निकषांवर हिमाचल प्रदेश गुजरातपेक्षाही अधिक उत्तम असल्याचेही ते म्हणाले.जीएसटीचा फटका बसलेल्या घटकांना दिलासा देण्यासाठी आम्ही सत्तेवर आल्यानंतर या करप्रणालीत संपूर्ण बदल करणार आहोत, असे गांधी यांनी पाओंता साहिब, चंबा आणि नागरोटा येथील प्रचार सभांमध्ये स्पष्ट केले.

काँग्रेसच्या पाठिंब्याने ही करप्रणाली मंजूर करण्यात आल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला त्याबद्दल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने ज्या जीएसटीची अंमलबजावणी केली आहे ती आपल्या पक्षाने प्रस्तावित केलेली नाही. सरकारने घाईने जीएसटीची अंमलबजावणी केली, असेही ते म्हणाले.