राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकूण १९९ जागांवर मतदान पार पडले. ईव्हीएमच्या तक्रारी आल्यानंतरही यावेळी राजस्थानमध्ये यावेळी सर्वाधिक मतदान झाले. या निवडणुकीत वसुंधराराजे सरकारविरोधात असलेल्या जनमताचा काँग्रेसने पुरेपूर फायदा उठवला आहे. त्यामुळे गेल्या २० वर्षात प्रत्येक निवडणूकीनंतर सत्ताबदल रोखण्याच्या भाजपाची मनसुब्यांना काँग्रेसने सुरूंग लावल्याचे चित्र आहे.

भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून झालेल्या प्रचारसभांमुळे या निवडणुकीला कांटे की टक्करचे स्वरुप दिले होते. दरम्यान, आज य़ेथे मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये राजस्थानात काँग्रेसचाच वरचष्मा राहणार असल्याचे चित्र आहे.

यामध्ये टाइम्स नाऊ-सीएनएक्सच्या चाचणीनुसार, भाजपाची राज्यात यंदा निम्म्या जागांवर घसरण होणार असून त्यांना ८५ जागांवर समाधान मानावे लागेल. तर काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होऊन १०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य पक्षांच्या वाट्याला ९ जागा येतील. तसेच आजतक-एक्सिसच्या चाचणीमध्ये भाजपाला ६३ जागा, काँग्रेसला १३० जागा तर अन्य पक्षांना ६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

२०१३ची आकडेवारी काय म्हणते?

राजस्थानमध्ये आजवर १४ विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. यांपैकी ९ वेळा काँग्रेसने येथे विजय मिळवला आहे. तर ४ वेळा भाजपाने तर एकदा जनता पार्टीने इथे सत्ता स्थापन केली आहे. भाजपाने २०१३मध्ये राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीतील आजवरचा सर्वात मोठा पक्ष ठरत मोठा विजय मिळवला होता. १६३ जागांसह वसुंधरा राजे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या होत्या. तर काँग्रेसच्या केवळ २१ जागा तर अन्य पक्षांच्या पारड्यात १६ जागा आल्या होत्या.