देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली परिस्थिती अद्याप कायम आहे. करोना रुग्णांची संख्या एकीकडे कमी होत असताना मृत्यूंच प्रमाण अद्याप चार हजारांच्या पुढेच असल्याचं चित्र आहे. देशात दररोज साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांतील मृतांची आकडेवारीही चिंताजनक आहे. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतात काल दिवसभरात तीन लाख ११ हजार १७० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ६२ हजार ४३७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४,०३७ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

देशात झालेल्या एकूण ४,०३७ मृत्यूंपैकी ९६० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. सध्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी मृत्यूदर वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात काल ५९ हजार ७३ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ३४ हजार ८४८ नवीन करोनाबाधित आढळून आले

देशात रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर हा ८३.८३ टक्के आहे. भारतात नवीन करोना रुग्णांची संख्या पाच दिवसांत चौथ्यांदा बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे. दहा राज्यांत बरे होण्याचा दर ७०.४९ टक्के आहे. देशात एकूण बळींची संख्या २ लाख ७० हजार २८४ आहे. तर एकूण रुग्णसंख्या ही २ कोटी ४६ लाख ८४ हजार ०७७ इतकी आहे.