देशातील करोना रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांमध्ये करोना संसर्गाचे ४२,९८२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४१,७२६ संक्रमित रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. त्याच वेळी, ५३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ४,११,०७६ झाली आहे, ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात ३,१८,१२,११४ करोना रुग्ण आढळले. त्यापैकी ३,०९,७४,७४८ करोना बाधितांनी करोनावर मात केली आहे. तर ४,२६,२९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात दिवसभरात ७ हजार ४३६ जण करोनामुक्त 

राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही राज्यात दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तसेच, रूग्ण करोनातून बरे देखील होत आहेत. राज्यात रोज आढळून येणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. काल दिवसभरात राज्यात ७ हजार ४३६ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ६ हजार १२६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, १९५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,१७,५६० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.६९ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,२७,१९४  झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३३४१० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.