देशातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. रोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज करोनाबाधितांची संख्या करोनातून बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. महाराष्ट्र सरकारने करोना आकडेवारीत दुरुस्ती केल्याने काल देशभरात गेल्या २४ तासांत ३९९८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४२ हजार १५ जणांना करोनाची लागण झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले. दरम्यान आज (गुरुवार) ४० हजाराच्यावर करोना रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ३८३ नवे करोना रुग्ण आढळले.

केंद्रीय आरोग्यमंत्रालाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले. तर ३८ हजार ६५२ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ५०७ रुग्णांचा करोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख ०९ हजार ३९४ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

आतापर्यंत देशात ३ कोटी १२ लाख ५७ हजार ७२० करोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०४ लाख २९ हजार ३३९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ४ लाख १८ हजार ९८७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचा पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे देशात लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत देशात ४१ कोटी ७८ लाख ५१ हजार १५१ लसीचे डोस देण्यात आले आहेत.

राज्यात ९४,७४५ ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात ८ हजार १५९ नवीन करोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात आज १६५ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,०८,७५० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३०,९१८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.