देशव्यापी करोना लसीकरण मोहिमेत दोन दिवसांत दोन लाख २४ हजार ३०१ करोनायोद्धय़ांना लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी ४४७ जणांवर प्रतिकूल परिणाम म्हणजेच लसीचा साइड इफेक्ट झाला आहे. लसीचा प्रतिकूल परिणाम झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने रविवारी दिली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नगरमधील आठ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाही करोना लसीचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.

आरोग्य विभागाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत लसीकरण मोहिमेची आकडेवारी जाहीर करण्यात आली. ‘‘लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दोन लाख सात हजार २२९ करोनायोद्धय़ांचे लसीकरण करण्यात आले, तर रविवारी सुटीचा दिवस असल्याने केवळ सहा राज्यांमध्ये लसीकरण करण्यात आले. या लसीकरणामध्ये एकूण ५५३ सत्रांमध्ये १७ हजार ७२ जणांना लस टोचण्यात आली’’, असे आरोग्य विभागाने जाहीर केले. रविवारी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर आणि तमिळनाडूमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले.

आणखी वाचा- उत्तर प्रदेशात करोनाची लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू?; कुटुंबियांचा गंभीर आरोप

देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लस घेतलेल्या एकूण दोन लाख २४ हजार ३०१ पैकी  ४४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास जाणवला. त्यापैकी तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले. परंतु इतर ४४४ जणांना ताप, डोकेदुखी आणि मळमळ अशी किरकोळ लक्षणे आढळल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची रविवारी बैठक घेण्यात आली. त्यात लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्याबरोबरच मोहिमेतील अडथळे आणि नियोजनातील त्रुटी दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आणखी वाचा- भारतानं अमेरिका, युके, फ्रान्सलाही टाकलं मागं; पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना दिली लस

परिचारिका आजारी, प्रकृती स्थिर

कोलकात्यामधील पस्तीस वर्षे वयाची परिचारिका लस घेतल्यानंतर आजारी पडली असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. वैद्यकीय तज्ज्ञ मंडळामार्फत या प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे. या परिचारिकेला लस दिल्यानंतर भोवळ आली. आरोग्य खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली असून सदर परिचारिकेची प्रकृती  स्थिर आहे.

आणखी वाचा- इस्रायल : करोना लसीकरणानंतर १३ जणांना Facial Paralysis; साईड इफेक्ट झालेल्यांचा आकडा वाढण्याची भीती

दिल्लीत किरकोळ बाधेची ५१ प्रकरणे

राजधानी दिल्लीत शनिवारी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी पुरळ उमटणे, सूज येणे किंवा ताप येणे यासारखी किरकोळ लक्षणे दिसण्याची एकूण ५१ प्रकरणे आढळली. दिल्लीत निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त ५३ टक्के लोकांनी कोविड-१९ची लस टोचून घेतली. ‘थांबा आणि वाट पाहा’ भूमिका, संवादाचा अभाव आणि को-विन अ‍ॅपमधील त्रुटी ही त्याची कारणे असल्याचे तज्ज्ञांनी रविवारी सांगितले. दिल्लीत नोंदणी झालेल्यांपैकी ५३.३ टक्के, म्हणजे ४३१९ आरोग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी लस देण्यात आली. राजीव गांधी विशेषोपचार रुग्णालयात ४५ जणांना लस देण्यात आली. ‘एम्स’मधील एका सुरक्षारक्षकाला करोनाच्या लशीचा डोज घेतल्यानंतर अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन झाली. त्याला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

नगरमध्ये आठ जणांना त्रास

करोना प्रतिबंध लस घेतल्यानंतर नगरमधील आठ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना त्रास झाला. खबरदारीचा  उपाय म्हणून तीन आरोग्य सेविकांवर  जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पोखरणा यांनी  सांगितले.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक लसीकरण

भारताच्या औषध महानियंत्रकांनी ‘कोव्हीशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सीन’ या दोन लशींना मान्यता दिली असून, देशात शनिवारी लसीकरणास प्रारंभ झाला. देशात पहिल्या दिवशी १.९१ लाख लाभार्थीना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली असून त्यात सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेशातील आहे. तेथे एकूण २१२९१ लोकांना लस देण्यात आली. सध्या देशात २०८८२६ एकूण उपचार घेणारे रुग्ण असून त्यांची संख्या केरळात सर्वाधिक म्हणजे ६८६३३ आहे. महाराष्ट्र ५३१६३, उत्तर प्रदेश ९१६२, कर्नाटक ८७१३, पश्चिम बंगाल ७१५१, तमिळनाडू ६१२८ या प्रमाणे रुग्णांची संख्या आहे. एकूण रुग्णांची संख्या एक कोटींवर असून १.५ लाख लोक मरण पावले आहेत.

कोणत्या राज्यात किती लसीकरण

भारतात काल कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींच्या माध्यमातून लसीकरण सुरू झाले आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ३३५२ लसीकरण सत्रे झाली, त्यात १९११८१ जणांना लस देण्यात आली. कोणत्या राज्यात किती जणांना पहिल्या दिवशी लस देण्यात आली त्याची यादी खालील प्रमाणे…

उत्तर प्रदेशात > २१,२९१

आंध्र प्रदेश > १८,४१२

महाराष्ट्र > १८,३२८

बिहार > १८,१६९

ओडिशा > १३,७४६

कर्नाटक > १३,५९४

गुजरात > १०,७८७

राजस्थान > ९,२७९

पश्चिम बंगाल > ९,७३०

मध्य प्रदेश > ९,२१९

केरळ > ८,०६२

छत्तीसगड > ५,५९२

हरयाणा > ५,५८९

दिल्ली > ४,३१९

तेलंगण > ३,६५३

आसाम > ३,५२८

झारखंड > ३,०९६

उत्तराखंड > २,२७६

जम्मू व काश्मीर > २,०४४

हिमाचल प्रदेश > १,५१७

पंजाब > १,३१९

मणिपूरमध्ये > ५८५

नागालँड > ५६१

मेघालय > ५०९

गोवा > ४२६

त्रिपुरा > ३५५

मिझोराम > ३१४

पुडुचेरी > २७४

चंडीगड > २६५

अंदमान व निकोबार > २२५

सिक्कीम > १२०

दादरा नगर हवेली > ८०

लडाख > ७९

दमण व दीव > ४३

लक्षद्वीप > २१