नवी दिल्ली : देशात गेल्या एका दिवसांत आणखी तीन लाख ४३ हजार १४४ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या दोन कोटी ४० लाख ४६ हजार ८०९ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत करोनामुळे आणखी चार हजार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या दोन लाख ६२ हजार ३१७ वर पोहोचली आहे, असे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, सध्या ३७ लाख चार हजार ८९३ उपचाराधीन रुग्ण असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या १५.४१ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून ते ८३.५० टक्क््यांवर आले आहे. आतापर्यंत एकूण दोन कोटी ७९ हजार ५९९ जण करोनातून बरे झाले आहेत.

तर मृत्युदर १.०९ टक्के इतका आहे.

देशात गेल्या एका दिवसात करोनामुळे चार हजार जणांचा मृत्यू झाला त्यापैकी ८५० जण महाराष्ट्रातील आहेत तर देशात एकूण दोन लाख ६२ हजार ३१७ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी ७८ हजार ८५७ जण महाराष्ट्रातील आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.