लॉकडाउन जाहीर केल्यामुळे देशातील जवळपास १.२ लाख ते २.१ लाख लोकांचा जीव वाचला असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या मॉडेलनुसार लॉकडाउन जाहीर केला नसता तर देशातील करोना रुग्णांची संख्या ३६ ते ७० लाखांवर गेली असती अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव प्रवीण श्रीवास्तव यांनी आकडेवारीतून लॉकडाउन किती प्रभावी ठरला हे दिसत असल्याचं म्हटलं आहे.

बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने लॉकडाउन किती प्रभावी ठरला हे पाहण्यासाठी दोन अंदाज मांडले आहेत. त्यानुसार, लॉकडाउनमुळे ३६ ते ७० लाख लोक करोनाची लागण होण्यापासून बचावले आहेत. तर १.२ लाख ते २.१ लाख लोकांचा जीव वाचला आहे. तर पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियानुसार (PHFI) ७८ हजार लोकांचा जीव वाचला आहे. तर MK&SR यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, २३ लाख लोकांचा करोनापासून बचाव झाला असून ६८ हजार लोकांचा जीव वाचला आहे.

आम्ही जे मॉडेल आत्मसात केलं आहे त्यानुसार लॉकडाउन जाहीर करण्या आल्याने १४ ते २९ लाख लोकांना करोनापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं असून ३७ ते ७८ हजार लोकांचा जीव वाचला आहे अशी माहिती प्रवीण श्रीवास्तव यांनी दिली आहे.

एम्पावर्ड ग्रुपचे चेअरमन व्ही के पॉल यांनी सांगितलं आहे की, “लॉकडाउनमुळे आपण तीन गोष्टी मिळवल्या आहेत. मृतांची संख्या, करोना रुग्णांची संख्या तर करोनाचा प्रसार करणाऱ्यांची संख्या रोखण्यात लॉकडाउनमुळे यश मिळालं आहे”. भारतात सध्या करोनाचे १ लाख १८ हजार ४४७ रुग्ण असून ३५८३ जणांचा मृत्यू झाला आहे.