करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला आहे. फेब्रुवारीमध्ये डोकं वर काढलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अवघ्या तीन महिन्यातच विध्वंसक परिस्थितीत ढकललं आहे. दररोज लाखो लोक करोनाच्या तडाख्यात सापडत असून, अनेक कुटुंबं उघड्यावर आली आहे. भयावह गोष्ट म्हणजे दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा प्रचंड वेगाने वाढला असून, फक्त एप्रिल महिन्याच्या ३० दिवसांत देशात ४५,००० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

नवं वर्ष सुरू झाल्यानंतर करोनाची भीती दूर होऊ लागली होती. मागचं संपूर्ण वर्ष लॉकडाउनमध्ये गेल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर यायला लागलं होतं. भारताने करोनावर विजय मिळवल्याचे दावेही सरकारांकडून केले जात होते. अशातच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं. बघता बघता मार्चमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर एप्रिलमध्ये एका दिवसातील विश्वविक्रम करोना रुग्णसंख्येची नोंद भारतात झाली.

एप्रिल महिन्यात करोनाच्या दुसरी लाटेनं त्सुनामीसारखाच रौद्रावतार घेतला. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानसह देशातील विविध राज्यात नागरिकांचे मदतीसाठीचे टाहो कानावर येऊ लागले. आधी रुग्णालयांबाहेर रांगा दिसत होत्या, नंतर स्मशानभूमी कब्रस्थानं यांच्याबाहेर मृतदेहांच्या रांगा लागल्याच्या दृश्यांनी देशातील परिस्थिती कोलमडत असल्याचं दिसून आलं. एप्रिलमध्ये करोनानं मृत्यूचं तांडवच घातलं. अवघ्या तीस दिवसांत देशात ४५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला. बेड न मिळाल्याने, ऑक्सिजनअभावी, रेमडेसिवीर न मिळाल्याने, तर कुणाचा घरीच…

१ एप्रिल रोजी देशातील एकूण करोना रुग्णसंख्या होती १,२३,०२,११५ आणि एकूण मृत्यू संख्या होती १,६३,४२८. तर देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या होती ६,१०,९२९ इतकी. ही सख्या ३० एप्रिल रोजी प्रचंड बदलून गेली. ३० एप्रिल रोजी देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या पोहोचली १,८७,५४,९८४ आणि मृतांचा आकडा पोहोचला २,०८,३१३ वर. तर ३० एप्रिल रोजी देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या होती ३१,६४,८२५ इतकी.