सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन असून फक्त जीवनाश्यक वस्तू आणण्यासाठी लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत काही स्वयंसेवी संस्था गरीब, गरजू कुटुंबाना धान्य पुरवण्याचं काम करत आहे. लॉकडाउनचा सर्वात मोठा फटका ज्यांचं हातावर पोट आहे असे मजूर, गरीब लोकांना बसला आहे. दरम्यान अशा लोकांच्या मदतीसाठी अनेक लोक पुढे येत आहेत.

मात्र अशावेळी काहीजण या परिस्थितीचा गैरफायदा उचलत असल्याचं समोर आलं आहे. राजकोटमध्ये अशीच एक घटना घडली आहे. राजकोटमधील एका व्यक्तीच्या घरात रेशनचं सर्व सामान भरलेलं होतं. मात्र यानंतरही कुटुंबातील लोक संस्थेला फोन करुन जेवण मागवत होते. रोज कुटुंबातील एक सदस्य धान्य आणि जेवण मिळावं यासाठी संस्थेला फोन करत होतं. यानंतर संस्थाही जेवण पुरवत होती. तर दुसरी टीम त्यांना धान्य पुरवत होती.

यादरम्यान संस्थेला संशय आला. यानंतर त्यांनी घरी जाऊन आम्ही धान्य पुरवठा करत असल्याचा पुरावा हवा असल्याने स्वयंपाकघऱाचा फोटो काढायचा असल्याचं सांगितलं. या बहाण्याने त्यांनी स्वयंपाकघराची पाहणी केली. यावेली तिथे तेल, डाळींसहित रेशनचं सर्व सामान असल्याचं समोर आलं. चौकशी केली असता तेलाचा डबा एक महिन्यापूर्वी खरेदी केल्याचं उत्तर त्यांनी दिलं.

तसंच आपली मुलगी जामनगर येथे शिक्षणाला असून तिच्यासाठी चिप्स तयार केले असल्याचा दावा महिलेने केला. या घटनेवर जिल्हाधिकारी रेम्या मोहन यांनी म्हटलं आहे की, “ही चुकीची प्रवृत्ती आहे. यावेली गरजू लोकांना जास्त गरज आहे. जर आपण धान्याचा साठा करुन ठेवला तर ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे कृपया असं करु नका. जे असं करत आहेत त्यांची माहिती आम्हाला द्या”.