करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात आर्थिक आणीबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ४ महिन्यांच्या काळात अनेक उद्योग-धंदे, व्यवसाय बंद असल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. अनलॉकच्या काळात आता काही गोष्टींना सरकारने परवानगी दिली आहे. हॉटेल व्यवसायिकांनाही होम डिलिव्हरीचा पर्याय देऊन हॉटेल पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. Online Food Delivery कंपनी झोमॅटोने केलेल्या एका सर्वेक्षणात भारतामधील ४० टक्के रेस्टॉरंट्स कायमस्वरुपी बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला १० टक्के रेस्टॉरंट्स ही कायमस्वरुपी बंद झालेली असून उर्वरित ३० टक्के रेस्टॉरंट करोनाची परिस्थिती निवळल्यानंतरही पुन्हा सुरु होतील याची खात्री नाहीये.

सध्याच्या घडीला देशभरात फक्त १७ टक्के रेस्टॉरंट्स सुरु आहेत. उर्वरित ८३ टक्क्यातील १० टक्के रेस्टॉरंट ही कायमस्वरुपी बंद तर उर्वरित ३० टक्के ही बंद होण्यच्या मार्गावर असल्याचं झोमॅटोने आपल्या अहवालात म्हटलंय. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका देशभरातील हॉटेल व्यवसायिकांना बसला आहे. आजही अनेक राज्यांत लॉकडाउन सुरु आहे. त्यातचं विषाणूच्या प्रादुर्भावाची भीती अजुनही लोकांच्या मनात कायम असल्यामुळे लोकं घराबाहेर पडत नाहीयेत.

लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून भारतीयांनी अंदाजे २० कोटीवेळा हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर दिली आहे. यापैकी ७ कोटीवेळा या ऑर्डर्स झोमॅटोने ग्राहकांपर्यंत पोहचवल्या आहेत. परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यवसायिकांनी आपला धंदा सुरु रहावा यासाठी होम डिलीव्हरीचा पर्याय सुरु ठेवला आहे. ज्या शहरांमध्ये लॉकडाउन हटवण्यात आलेलं असून नियमांमध्ये शिथीलता आणलेली आहे अशा भागांतही १७ टक्के रेस्टॉरंट्स सुरु आहेत. परंतू करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या हॉटेल व्यवसायिकांना फार कमी प्रतिसाद मिळत आहे. झोमॅटोच्या अहवालानुसार कोलकाता शहरात सर्वाधिक रेस्टॉरंट सुरु असून त्याखालोखाल चेन्नई शहराचा नंबर लागतो.