करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर देशातील दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येनं साडेचार लाखांची उच्चांकी संख्या नोंदवली गेली. आता हळहळू रुग्णसंख्या घसरत असल्याचं दिसून येत आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ३० लाखांच्या खाली आली आहे. पण, दररोज होत असलेल्या मृत्यूंच्या बाबतीत ‘भय इथले संपत नाही’ अशीच अवस्था आहे. देशातील मृतांची दररोजची सरासरी कायम असून, देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत दोन लाख ५७ हजार २९९ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे तीन लाख ५७ हजार ६३० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या दैनंदिन संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत देशात चार हजार १९४ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ९५ हजार ५२५ वर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी गेला आहे. तामिळनाडूत ३६ हजार १८४ रुग्ण आढळून आले. तर त्यापाठोपाठ कर्नाटक ३२ हजार २१८, केरळ २९ हजार ६७३, महाराष्ट्र २९ हजार ६४४ आणि आंध्र प्रदेश २० हजार ९३७ या पाच राज्यांचा समावेश आहे.

लस उपलब्धतेसाठी परराष्ट्रमंत्री सोमवारपासून अमेरिका दौऱ्यावर

महाराष्ट्रातील स्थिती कशी आहे?

राज्यात काल (२१ मे) दिवसभरात २९ हजार ६४४ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर ४४ हजार ४९३ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. दिवसभरात ५५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५०,७०,८०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९१.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८६ हजार ६१८ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे.