करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील दररोज साडेचार लाखांच्या आसपास असलेली रुग्ण संख्या आता घसरत असल्याचं दिसून येत आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ३० लाखांच्या खाली आली आहे. पण देशातील मृतांची दररोजची सरासरी मात्र खाली येताना दिसत असून, देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात करोनामुळे तीन हजार ७४१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे शुक्रवारी मृत पावलेल्या रुग्णांच्या प्रमाणात ही आकडेवारी कमी असल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत दोन लाख ४० हजार ८४२ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ५५ हजार १०२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या दैनंदिन संख्येत कोणतीही घट होताना चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन हजार ७४१ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ९९ हजार २२६ वर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी गेला आहे. राज्यात शनिवारी ४० हजार २९४ जण करोनामुक्त झाले आहेत तर ६८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २६ हजार १३३ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

देशात सध्या २८ लाख ५ हजार ३९९ रुग्ण हे उपचाराधीन आहेत. २ लाख ९९ हजार २६६ जणांचा करोनामुळे जीव गेला आहे. देशात एकूण २ कोटी ६५ लाख ३० हजार १३२ जणांना करोनाची लागण झाली आहे तर २ कोटी ३४ लाख २५ हजार ४६७ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहे.

राज्यातील परिस्थिती कशी आहे?

राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होत असलेल्यांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने अधिक आहे. ही बाब जरी दिलासा देणारी असली तरी, अद्यापही करोना रूग्णांच्या मृत्यू संख्या कमी झालेली नाही. गेल्या २४ तासांत राज्यात ४० हजार २९४ रूग्ण करोनातून बरे झाले असून, २६ हजार १३३ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ६८२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.