भरतामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संखेतील घट सोमवारीही कायम आहे. आरोग्य मंत्रलयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३६ हजार ४६९ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. १८ जुलै रोजी ३४ हजार ८८४ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर दररोज करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली होती. १७ सप्टेंबरपर्यंत देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत होती. त्यानंतर मात्र दररोज करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. ऑक्टोबर महिन्यात दररोज वाढणाऱ्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी झाली आहे. दिलासादायक म्हणजे भारतात करोनावर मात करणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे तर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्‍याण मंत्रालय (MoHFW) ने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ७९ लाख ४६ हजार ४२९ इतकी आहे. गेल्या २४ तासांत ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या एक लाख १९ हजार ५०२ इतकी झाली आहे.

उपचार घेणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासांत २७ हजार ८६० ने घट झाली आहे. सध्या देशात सहा लाख २५ हजार ८५७ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत देशात ६३ हजार ८४२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ७२ लाख १ हजार ७० इतकी झाली आहे.

सध्या भारताचा रिकव्हरी रेट ९०.६ टक्के इतका झाला आहे.