भारतात हळहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत असला, तरी वाढत चालेल्या रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. एका संस्थेनं केलेल्या अभ्यासातून भारतासाची काळजीत भर टाकणारे निष्कर्ष समोर आले आहे. जपानस्थित सुरक्षेसंबंधित नोमुरा संस्थेनं करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील ४५ अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला आहे. यात भारत ‘डेंजर झोन’मध्ये (धोकायदायक श्रेणी) असल्याचं म्हटलं आहे. भारतात पुन्हा करोनाचा उद्रेक होण्याची भीती असून, लॉकडाउन लागू होऊ शकतो, असं नोमुरानं म्हटलं आहे.

देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केला होता. अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर देशातून लॉकडाउन शिथिल करण्यात येत आहे. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असताना जपानमधील नोमुरा या संस्थेनं केलेल्या अभ्यासानं भारताच्या चिंतेत भर पडली आहे. नोमुरानं आपल्या संशोधनात जगातील सर्वात मोठ्या ४५ अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची श्रेणी निहाय विभागणी केली आहे. यात पहिली श्रेणी ऑन ट्रॅक, दुसरी वॉर्निंग साइन व तिसरी डेंजर झोन अशी वर्गवारी करण्यात आली आहे. नोमुरानं केलेल्या अभ्यासानुसार लॉकडाउन हटवल्यानं दोन प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

पहिली स्थिती (चांगले संकेत) : लॉकडाउन हटवल्यानंतर लोकांचं करोनातून बरं होण्याचं प्रमाण वाढेल. दररोज काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढू शकते. पण, लोकांची भीती कमी होईल. त्यामुळे व्यवसाय सुरू होतील, जनजीवन पूर्वपदावर येईल. जसंजशी रुग्णांची संख्या कमी होईल, तसे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

दुसरी स्थिती (वाईट परिणाम) : लॉकडाऊन हटवून अर्थव्यवस्थेला चालना देतानाच करोनाचं संक्रमण वाढत जाईल. त्याचबरोबर बाधित रुग्णांची संख्याही वाढत जाईल. यामुळे लोकांच्या मनात भीती वाढेल आणि जनजीवन पुन्हा विस्कळीत होईल. अंत्यत गंभीर स्थिती लॉकडाउन पुन्हा लादला जाऊ शकतो, असा निष्कर्ष नोमुराच्या अभ्यासात मांडण्यात आला आहे.

डेंजर झोन म्हणजे नेमकं काय?

नोमुरानं केलेल्या वर्गवारी डेंजर झोनमधील देशांची वेगळी यादी करण्यात आली आहे. यात भारतासह पाकिस्तान, सौदी अरेबिया, कोलंबिया, ब्राझील, सिंगापूर, इंडोनेशिया, मेक्सिको, कॅनडा, अर्जेटिंना, दक्षिण आफ्रिका, चिली, स्वीडन आणि इक्वाडोर या देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. या देशांमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ज्यामुळे परिस्थिती चिंताजनक होऊन लॉकडाउन लागू करण्याची स्थिती उद्भवू शकते.