देशात करोनाची दुलरी लाट ओसरत आहे. मात्र देशात दैनंदिन करोनाच्या आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज (सोमवार) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत करोनाचे ३९ हजार ३६१ नवीन रुग्ण आढळले. तर ४१६ करोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल (शुक्रवार) ३९ हजार ७४२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ३५ हजार ९६८ जणांनी करोनावर मात केली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला. दरम्यान काहीसं दिलासादायक वातावरण देशात आहे. सध्या देशात ४ लाख ११ हजार १८९ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यांत देशात ३ कोटी ०५ लाख ०३ हजार १५९ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर ४ लाख २० हजार ९६७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात ६ हजार ८४३ नवे करोनाबाधित 

राज्यात ६ हजार ८४३ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर १२३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ५ हजार २१२ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी कमी होताना दिसत असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असतानाच, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबतही सतर्क केले जात आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्यी ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,३५,०२९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.