गेल्या तीन आठवड्यांपासून करोना व्हायरसचा होणार फैलाव आणि त्याचा वेग चिंता वाढवणारा असल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला देण्यात आलेल्या सल्ल्यांवर पक्षपाती आणि अत्यंत वाईट पद्धतीने पाऊलं उचलली जात असल्याचंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर सोनिया गांधी यांची आज पक्षातील काही प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली. करोनाचा फैलाव कमी करत नियंत्रण मिळवण्यामध्ये सरकार अयशस्वी झाल्याची टीका यावेळी सोनिया गाधी यांनी केली.

करोनाचं संकट निर्माण झाल्यापासून पहिल्यांदाचा सोनिया गांधी यांनी भाजपावर जाहीर टीका केली आहे. सोनिया गांधी यांनी यावेळी सत्ताधारी पक्षाकडून जातीय द्वेषाचा व्हायरस पसरवला जात असल्याचा आरोप करत चिंता व्यक्त केली. प्रत्येक भारतीयाने याबाबत चिंता करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

“मला तुमच्यासोबत असं काही शेअर करायचं आहे ज्याची प्रत्येत भारतीयाने चिंता करण्याची गरज आहे. जेव्हा आपण सर्वांनी एकत्रितपणे करोनाशी लढा देणं अपेक्षित असताना भाजपा मात्र जातीय पूर्वग्रह आणि द्वेष पसरवत आहेत. आपल्या सामाजिक सुसंवादाला मोठं नुकसना पोहोचवलं जात आहे. आपल्या पक्षाला हे नुकसान भरुन काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागणर आहे,” असं सोनिया गांधींनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “लॉकडाउनमुळे १२ कोटी बेरोजगार, प्रत्येक कुटुंबाला किमान साडेसात हजारांची मदत हजार द्या”

आपण अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असून करोनाशी एकत्रित लढा देण्याची ऑफर दिली. तसंच शहरी आणि ग्रामीण भागात झालेलं नुकसान कमी करण्यासाठी काही सल्लेही दिली होते अशी माहिती सोनिया गांधी यांनी दिली. “पण दुर्दैवाने त्यांनी फक्त पक्षपातीपणे वाईट पद्दतीने निर्णय घेतले. केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेली करुणा, मोठेपणा कुठेही दिसत नाही,” अशी टीका सोनिया गांधींनी केली आहे.

लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा परिस्थितीत मजूर वर्गाचे तसंच हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सोनिया गांधी यांनी गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारनं त्वरित ७ हजार ५०० रूपये देण्याची मागणी केली आहे. “अनेक वैद्यकीय कर्मचारी कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय काम करत आहेत. आपण या सर्व करोना वॉरिअर्सना सलाम केला पाहिजे,” असंही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा- राष्ट्रपतींकडून अध्यादेशावर शिक्कामोर्तब; वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं पडणार महागात

“लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात १२ कोटी लोकांनी रोजगार गमावले आहेत. आर्थिक कामे रखडली असताना बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला किमान ७ हजार ५०० रूपयांची आर्थिक मदत देणे आववश्यक आहे,” असं सोनिया गांधी म्हणाल्या. यावेळी त्यांनी टेस्टिंग किट्सवरही निशाणा साधला. पीपीई किट्सची कमतरता आणि त्यांच्या गुणवत्तेबाबत सोनिया गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “सध्या करोनाच्या होणाऱ्या चाचण्यांची संख्या खुप कमी आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे,” असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही आरोप केले. “करोनाशी लढताना चाचण्या करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीतही चाचण्या कमी होत आहेत. तसंच पीपीई किट्सची गुणवत्ताही योग्य नाही. आम्ही अनेक सूचना केल्या. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही,” असंही त्यांनी सांगितलं.