करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. करोनाला रोखण्यासाठी सरकारकडून लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं वारंवार आवाहन केलं जात आहे. भारताने करोनाबाधितांची संख्या १२ हजारांच्या पुढे गेली आहे. करोनावर प्रभावी औषध किंवा लस मिळवण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. पण इतर देशांच्या तुलनेत भारत यामध्ये थोडा मागे आहे. यामागे नेमकं काय कारण आहे याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली आहे.

“नवीन औषध निघेल का? लस निघेल का? असं प्रत्येकाला वाटत आहे. पण इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे विषाणू उशिरा आला आणि आपण आयसोलेट केल्यानंतर जो वेळ गेला आहे, त्यामुळे लस शोधण्यामध्ये आपण एक दीड महिना मागे आहोत. रिसर्चला थोडा वेळ द्यावा लागतो. आज मी सांगितलं आणि उद्या औषध मिळेल अशी परिस्थिती नसते. एक औषध, लस शोधायला दीड ते दोन आठवड्यांचा वेळ लागतो. विषाणूने पैदास केल्यानंतरच औषध काम करतं की नाही हे लक्षात येतं. लोकांनी निराश होण्याचं गरज नाही. पण आपण लॉकडाउन सर्वात प्रभावी अस्त्र वापरलं आहे. इतर गोष्टींप्रमाणे तेही प्रभावी आहे,” असं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं आहे.

“करोनाचे विषाणू शरीरातून बाहेर काढून जिवंत ठेवणं सोपं नसतं. पण पुण्यातील वैज्ञानिकांना यामध्ये यश मिळालं आहे. बाहेर काढून ठेवलं आहे म्हणजे त्या विषाणू, जंतूला जिवंत ठेवण्यासाठी त्याला खाऊ घालून त्यांची संख्या वाढवणे. यामुळे आपल्याला तो विषाणू कोण आहे, काय आहे त्याचं परीक्षण करत सविस्तर अभ्यास करता येतो. व्हायरस आयसोलेट केल्याने त्याच्याविरोधात कोणतं औषध गुणकारक ठरु शकतं याचा अभ्यास करु शकतो. विषाणू आयसोलेट केल्याचा पहिला फायदा म्हणजे त्याच्याविरोधात कोणती उपचारपद्दती अवलंबली पाहिजे हे कळण्यात मदत होते. त्यानुसार त्या विषाणूंवर औषधांचा वापर करु शकतो. तसंच लस शोधण्यासाठी खूप मोठी मदत मिळत यश मिळण्याची संधी असते,” असं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- लॉकडाउन हे भारताने वापरलेलं सर्वात प्रभावी अस्त्र – डॉ. रमण गंगाखेडकर

खरंच वटवाघुळांमुळे करोनाचा फैलाव होताय का?
“एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ते म्हणजे कोणताही नवीन विषाणू, जंतू आकाशातून किंवा इतर कुठून तयार होत नाही. तो एखाद्या प्राण्यातून आपल्यात येणं अपेक्षित असतं. हा करोनाचा विषाणू वटवाघुळात सापडतो. हे चीनच्या संशोधनात दिसलं. त्यांना रुग्णाचा विषाणू आणि वटवाघुळांमधील विषाणूमध्ये साम्य आढळलं. यावरुन त्यांना हा वटवाघुळांमुळे आल्याचा संशय आला. हे साम्य असलं तरी ही काही दररोज होणारी घटना नसते. प्रत्येक प्राण्यासाठी ठराविक विषाणू असतात. वटवाघुळातील विषाणू माणसात घातल्यास तो जिवंत राहण्याची शक्यता कमी असते. हा वटवाघुळातील विषाणू एका जनावरातून माणसात आला असा चीनला संशय आहे. हे पाहिलेलं नसल्याने सगळा अंदाज आहे,” असं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं आहे.

“केरळममध्ये निपा वटवाघुळातून आल्याचं समोर आल होतं. त्यावेळी एक गोष्ट आमच्या लक्षात आली होती ती म्हणजे भारताला धोकादायक जनावरांमध्ये कोणते विषाणू असतात याची पाहणी गरजेचं आहे. म्हणून आम्ही  वटवाघुळाची पाहणी केली. पाहणी केली असता वटवाघुळांमध्ये करोना व्हायरसचा विषाणू दिसला. पण तो फक्त वटवाघुळात राहण्याची शक्यता जास्त आहे. तो माणसात आल्यानंतर तिथे मुलं जन्माला घालू शकत नाही. माणसात तो जिवंत राहू शकत नाही. लोकांनी उगाच घाबरु जाऊ नये. जनावरांच्या पोट जातीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नवे धोकादायक विषाणू तेथून येण्याचीही शक्यता असते. सीमारेषेवर ज्या पद्दतीने जवान प्रत्येक ठिकाणी तैनात असतात त्याप्रमाणे आपल्यालाही सगळीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे,” असं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटलं आहे.

लॉकडाउन हे भारताने वापरलेलं सर्वात प्रभावी अस्त्र असल्याचं त्यांनी  म्हटलं आहे. सर्वांनी सध्या सोशल डिस्टन्सिंग पाळणं, घरीच राहणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले आहेत. करोनाच्या विषाणूला वाढू दिलं नाही तर नव्याने लागण होण्याची संख्या कमी होईल, त्यासाठी लॉकडाऊन काटेकोर पाळणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले आहेत.