करोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधित रुग्णवाढ झाली आहे. गेल्या २४ तासात भारतात ६०८८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचली आहे. दरम्यान १४८ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ३५८३ झाली आहे. आतापर्यंत ४८ हजार ५३३ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, करोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ४०.९७ टक्के आहे.

गेल्या दोन दिवसांपासून देशात रोज पाच हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत असून गुरुवारी २४ तासांत ५,६०९ नवे रुग्ण आढळले होते. देशात महाराष्ट्राला करोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला असून रुग्णसंख्या ४१ हजारावर पोहोचली आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू (१३,९६७), गुजरात (१२,९०५) यांचा क्रमांक आहे. दिल्लीमध्य करोनाचे ११ हजार ६५९ रुग्ण आहेत. राजस्थानमध्ये करोनाचे ६२७७ रुग्ण असूम यामधील ३४८५ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात ५९८१ करोना रुग्ण असून २४८३ रुग्ण बरे झाले असून २७० जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी आढळला होता. त्यानंतर ४५ दिवसांनी म्हणजे १५ मार्च रोजी भारतातील करोनाबाधितांची संख्या १०० वर पोहोचली. तर भारताने एक हजाराचा टप्पा अधिक वेगाने म्हणजे २९ मार्च रोजी गाठला तर १३ एप्रिलपर्यंत बाधितांची संख्या १० हजारांवर गेली. ६ मे रोजी बाधितांची संख्या ५० हजारांवर पोहोचली तर बाधितांची संख्या एक लाखावर पोहोचण्यासाठी दोन आठवडय़ांहून कमी कालावधी लागला. जागतिक पातळीवर बाधितांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे तर तर ३.३ लाख जणांचा मृत्यू झाला आहे आणि १९ लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत.

जगात रुग्णसंख्येत भारत अकराव्या स्थानी
करोनाबाधितांच्या संख्येत जगात भारत अकराव्या स्थानावर आहे. मात्र, जगातील सुमारे १५ देशांतील मृतांचा आकडा भारतापेक्षा अधिक आहे. भारतात सध्या ६४ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येबाबत अमेरिका, रशिया, ब्राझील आणि फ्रान्सनंतर भारत पाचव्या स्थानावर आहे.