गेल्या काही दिवसांपासून देशात आणि खासकरुन मुंबई आणि दिल्लीत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने समूह संसर्ग होण्यास सुरुवात झाली असल्याची भीती व्यक्त केली जात होती. यादरम्यान केंद्र सरकारने देशात करोना संसर्गाला सुरुवात झाली नसल्याचं माहिती चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. “भारत खूप मोठा देश आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. भारतात समूह संसर्ग झालेला नाही,” अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी लॉकडाउन लागू केल्याने करोनाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यात यश मिळाल्याचं अधोरेखित केलं. “शहरी भागात करोनाचा फैलाव थोडा जास्त झाला आहे. पण लॉकडाउन करत आपण जी पावलं उचलली त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्यात आणि वेगाने त्याचा होणार फैलाव थांबवण्यात यश मिळालं,” असं बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे.

राज्यांनी सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं असून त्यात शिथीलता आणली जाऊ शकत नाही. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यांनी पाळत ठेवण्यासोबतच नव्या योजना आखण्याची गरज असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.

आरोग्य मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “आज देशात रिकव्हरी रेट ४९.२१ टक्के आहे. उपचार घेऊन बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा जास्त आहे. ही दिलासा देणारी गोष्ट आहे”.

देशात करोनासंबंधी रोज नवा रेकॉर्ड होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत करोनामुळे ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात इतक्या जणांच्या मृत्यूची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक ९९९६ रुग्णांची नोंद झाली.