लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. करोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. मात्र अद्यापही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही. त्यामुळे लॉकडाउन वाढवला जाणार की नियम शिथील करत सेवा सुरु केल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. करोना गावांमध्ये पसरु नये याची आपण खात्री करणं गरजेचं असून हे आपल्यासमोर सर्वात मोठं आव्हान असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सरकारने आता पुढे वाटचाल करण्याचा विचार करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. सोबतच मोठा दृष्टीकोन असण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे. “करोनाविरोधातील लढाईत आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालं असल्याचं जग सांगत आहे. या लढाईत राज्य सरकारांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असून धोका रोखण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावण्याचं काम केलं आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- मजुरांचं स्थलांतरण हे राज्यांसमोरील मोठं संकट; पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली चिंता

“आपण लोकांनी जिथे आहेत तिथेच थांबवावं यावर जोर दिला होता. पण आपल्या घरी जाणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे आपण आपल्या निर्णयात थोडा बदल केला. मात्र यानंतरही करोना गावांमध्ये पसरु नये याची आपण खात्री करणं गरजेचं आहे. हे आपल्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी स्थलांतरित कामगारांच्या मुद्द्यांवर बोलताना म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसी संवाद साधण्याची ही पाचवी वेळ आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते. अमित शाह यांनी यावेळी आरोग्य सेतू मोबाइल अॅप किती महत्त्वाचं आहे हे सांगताना लोकांना हे अॅप डाउनलोड करण्याचं आवाहन करण्यास मुख्यमंत्र्यांना सांगितलं.