लॉकडाउनचा फटका उद्योग, व्यवसायांसोबत मंदिरांनाही बसला आहे. लॉकडाउनमुळे मंदिरांचे दरवाजेदेखील बंद करण्यात आले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत विश्वस्त मंडळ असणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानसमोरही आर्थिक समस्या उभी राहिली रोख पैशाचां तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार कसा द्यायचा असा प्रश्न विश्वस्त मंडळासमोर उभा राहिला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानकडून श्री वेंकटेश्वर मंदिराचा संपूर्ण कारभार चालवला जातो. लॉकडाउनमुळे मंदिराचं ४०० कोटींचं नुकसान झालं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनमध्ये आतापर्यंत विश्वस्त मंडळाकडून कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन तसंच इतर ठरलेल्या गोष्टींवरील खर्च पकडून ३०० कोटी खर्च करण्यात आले आहेत. विश्वस्त मंडळाकडे सध्या आठ टन सोनं आणि १४ हजार कोटींचं फिक्स डिपॉझिट आहे. त्यांना हात न लावता रोख पैशांची समस्या कशी सोडवता येईल याचा विश्वस्त मंडळ विचार करत आहे. लॉकडाउनमुळे गेल्या ५० दिवसांपासून मंदिर बंद असून ते पुन्हा कधी सुरु होतील याचीही कोणती माहिती नाही. “तिरुमला तिरुपती देवस्थान आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन तसंच इतर खर्चांसाठी बांधील आहे. लॉकडाउनमुळे आम्हाला खूप मोठा फटका बसला आहे. दरवर्षी आमचा खर्च जवळपास २ हजार ५०० कोटी इतका असतो,” अशी माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानचे चेअरमन वाय व्ही सुब्बा रेड्डी यांनी दिली आहे. जिथे महिन्याला २०० ते २२० कोटींचा महसूल मंदिराला मिळत होता तिथे आज काहीच मिळत नसल्याचंही ते म्हणाले आहेत. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “एरव्ही मंदिरात दिवसाला ८० हजार एक लाख भाविक येत असतात. सणांच्या दिवसात ही गर्दी आणखी वाढते. पण सध्या भाविकांना परवानगी नसल्याने दैनंदिन पूजा आणि सण कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाविना केले जात आहेत”. दर्शनाचे तिकीट, देणगी, प्रसाद सर्व काही बंद असल्यानेही मंदिराला आर्थिक फटका बसला आहे. पण अशा परिस्थितीही विश्वस्त मंडळाकडून आरोग्य संस्थांना ४०० कोटींची मदत देण्यात आली आहे.