CoronaVirus Outbreak : करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा देशाला संबोधित करत मंगळवारी मोठी घोषणा केली. जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं अत्याधुनिक साधनं असूनही हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की तयारीच करता येत नाही. त्यामुळे मंगळवार रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.

पंतप्रधानांच्या या घोषणेला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला. क्रिकेट विश्वातील व्यक्तिंनीदेखील हा निर्णयाचे स्वागत केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात पुढील २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मी साऱ्यांना विनंती करतो की करोनामुक्त भारतासाठी आपण सारेच घरातच राहूया”, असे ट्विट भारताचा कर्णधार विराट कोहली याने केले.

“पुढचे २१ दिवस हे भारतासाठी आणि आपल्या जीवासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. देश आणि वैयक्तिक पातळीवर आपण याचे गांभिर्य लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे नागरिक, मुलगा, मुलगी, आई, वडिल, पती, पत्नी, भाऊ, बहिण अशा सगळ्या नात्यांनी आपली जबाबदारी ओळखा. कारण करोना रोखण्याचा हा एकमेव उपाय आहे”, अशा शब्दात फिरकीपटू हरभजनने मोदी यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे साऱ्यांनी आपापल्या घरात थांबा. तुम्ही तुमच्या वाटची जबाबदारी पार पाडा. करोनाला पळवून लावण्यासाठी योग्य खबरदारी घ्या, असा संदेश चेतेश्वर पुजाराने दिला.

माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेनेही मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

दरम्यान, मोदी यांच्या घोषणेआधीच देशातील अनेक राज्य लॉकडाउनमध्ये गेली होती. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचं ट्विट करून सांगितलं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी करोनाला आळा घालण्यासाठी कोणती मोठी घोषणा करणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. अखरे पंतप्रधान मोदी यांनी भूमिका मांडत करत त्यावरील पडदा दूर केला.