करोनासंदर्भातील सर्व माहिती देणारे आरोग्य सेतू अ‍ॅप सुरक्षित असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. एका फ्रेन्च हॅकरने मंगळवारी ‘९ कोटी भारतीयांची माहिती उघड होण्याचा धोका आहे,’ असं ट्विट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. “या अ‍ॅपवरील माहितीची चोरी किंवा सुरक्षेसंदर्भात कोणताही गोंधळ झालेला नाहीय. तसेच या हॅकर्सने या अ‍ॅपवरुन खासगी माहिती उघड होत असल्याचे सिद्ध केलेले नाही,” असं सरकारने आपल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलं आहे.

सरकारने दिलेल्या या उत्तरानंतर हॅकरनेही यावर ट्विटवरुन प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही म्हणत आहात की इथे काहीच उघड झालं नाहीय. आपण इथे पाहूयात. मी तुम्हाला उद्या भेटतो,” असं ट्विट या हॅकरने केलं आहे. काही तासांनंतर याच हॅकरने ट्विट करुन ‘तुम्हाला ट्रँग्युलेशन म्हणजे काय ठाऊक आहे का?’ असा सवाल भारत सरकारला केला आहे. ट्रँग्युलेशन पद्धतीमध्ये ठाऊक असणाऱ्या ठिकाणांवरुन त्रिकोण तयार करत ठाऊक नसलेली माहिती शोधण्याचा प्रयत्न केला जातो.

आरोग्य सेतूच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारा या हॅकरचे नाव इलियट अँडरसन असे आहे. इलियट हा फ्रान्समधील प्रसिद्ध सुरक्षा तज्ज्ञ (किंवा तांत्रिक भाषेत ज्याला एथिकल हॅकर म्हणतात) आहे. याआधीही इलियटने आधारकार्ड अ‍ॅपच्या सुरक्षेसंदर्भात माहिती उघड केली होती. त्याने आता आरोग्य सेतू अ‍ॅपबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने काँग्रेचे खासदार राहुल गांधी यांना टॅग करत ते या अ‍ॅपबद्दल बरोबर होते असंही म्हटलं आहे. “हाय, आरोग्य सेतू, तुमच्या अ‍ॅपमध्ये सुरक्षेसंदर्भातील अडचण दिसून आली आहे. ९ कोटी भारतीयांची खासगी माहिती उघड होण्याचा धोका आहे. तुम्ही मला पर्सनल मेसेजवर संपर्क करु शका का? महत्वाची नोंद राहुल गांधी बरोबर होते,” असं ट्विट इलियटने मंगळवारी केलं होतं.

या ट्विटनंतर तासाभरातच भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती इलियटने दिली. इलियटने ९ कोटी भारतीयांच्या आरोग्यासंदर्भातील माहिती अशी उपलब्ध करुन देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केलं आहे. “माझ्याकडे खूप कमी संयम आहे. मी एका ठराविक काळानंतर या अ‍ॅपवरील खासगी माहिती उघड करणार आहे,” असा इशाराच इलियटने दिला आहे.

राहुल गांधी यांनी मागील आठवड्यामध्येच आरोग्य सेतू अ‍ॅपबद्दल सावध राहण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. करोना रुग्णांची माहिती मिळवण्यासाठी सरकारकडून वापरण्यात येणारे हे अ‍ॅप म्हणजे नियोजित देखरेख करण्याचे साधन असल्याचे टीका राहुल गांधींनी केली होती. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी या टीकेला उत्तर देताना, हे अ‍ॅप म्हणजे लोकांचे संरक्षण करण्यासाठी एक शक्तीशाली माध्यम असल्याचे म्हटले होते.

केंद्राने करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेतू अ‍ॅप तयार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक केंद्रीय मंत्री या अ‍ॅपचा प्रचार करताना दिसत आहेत. हे अ‍ॅप सरकारी तसेच खासगी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य असल्याचेही सांगण्यात आलं आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये ३० कोटी लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करायला हवं असा केंद्राचा मानस आहे.