भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये करोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या २४५ पर्यंत पोहोचली आहे. त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. श्रीलंकेने संकटाचे गांर्भीय ओळखून स्वत:ला बंद केले आहे. श्रीलंकेने शेअर बाजारही बुधवारी बंद ठेवला. भारतीय उपखंडात करोना बाधितांची संख्या ४८२ पर्यंत पोहोचली आहे.

अनेक देशांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी तातडचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आणले आहेत. जगभरात आतापर्यंत दोन लाख लोकांना करोनाची लागण झाली असून, आठ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. “शांतता पाळा, करोनाची चाचणी करण्याची घाई करु नका. अमेरिकेकडे सुद्धा प्रत्येकाची चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध नाही. ज्यांना तीव्र लक्षणे दिसतायत, त्यांनीच रुग्णालयात जावे. घाबरण्याची गरज नाही. आपण सर्व मिळून करोनाशी लढा देऊ. आपण ही लढाई जिंकू” असे इम्रान खान म्हणाले.

करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानला अचूक निदान आणि रुग्णालयातील आरोग्य सुविधा सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तात्काळ २० कोटी डॉलरचे कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तानची वर्ल्डबँकबरोबर बोलणी सुरु आहे.